होतं असं कधी कधी......
खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये असतो आपण...बऱ्याच वर्षांनी अचानक एका जवळच्या मित्राला आठवण येते आपली....इचछा असूनही कॉल उचलू शकत नाही..संध्याकाळी घरी आल्यावर आठवण येते ...परत कॉल करावा तर बोलायला विषय नसतो आपल्याकडे ...टाळतो आपण कॉल करायचा .....त्याचा दोन दिवसानंतर मेसेज येतो...तुझ्या ऑफिस बाहेर होतो ...भेटलो असतो..जुन्या आठवणी काढत बसतो आणि मन रमवतो त्यातच .... स्वतःला खोटं समजावत.... कडक उन्हात सिग्नल ला बाईक उभी असते आपली ...रस्त्याच्या कडेला एक वृद्ध जोडपं असतं मागत लोकांना...माया,कणव दाटून येते मनात आपल्या ...कसं आपल्या आई वडिलांना लोक असं वाऱ्यावर सोडत असावेत?? पाकिटात हात जातो...शंभराची नोट लागते हाती...व्यवहार जागा घेतो ममतेची...समोरचा म्हातारा ओळखतो बदल तो...दहा दिलेस तरी खूप आहेत पोरा...तो सुटका करतो आपली पेचातून....आपल्याच नजरेत आपल्याला छोटं करून.... दिवाळीचे पाहुणे असतात जमलेले ....आज कामवाली येणार कि नाही याची धाकधूक असते...तिच्या असण्याने आपण किती निवांत आहोत याची जाणीव होते अशा वेळी...दुपारची जेवणे उरकून गप्पा रंगात आलेल्या असतात....ती येते......